ती चांगलीच आहे


माहित नाही कशी आहे ती, अंदाज नाही मला तिचा
तरीही ती चांगलीच आहे.
फेसबुक व्हाट्सअप ला तासन्तास ऑनलाइन दिसते
तरीही ती चांगलीच आहे.
पोस्ट, कंमेंट, लाईक कधीच नसते; ऍक्टिव्हमात्र असते
तरीही ती चांगलीच आहे.
तिचं काही आहे-नाही, होतं-नव्हतं काही माहित नाही
तरीही ती चांगलीच आहे.
एका नजरेत आवडली, तिचा समजूतदारपणा भावला
पण ती समजूतदार असेलही- नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
पहिल्यांदाच हृदय दिलंय, तिला हृदय नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
भीती वाटते नकाराची, तिनं नाही म्हटलं तर?
तरीही ती चांगलीच आहे.
कधीकधी वाटतं धाडस करावं, एकदाचं विचारावं
पण! पण ती "हो" म्हणाली तर?
कारण ती चांगलीच आहे.
©सुरज मडके

कोल्हापूर दर्शन: माझ्यावर नजरेतून

काल संध्याकाळी गावाकडून सागर पाटलांचा फोन आला. "हं मी येतोय उद्या, रुपनारायण बघायला." माझा 'रुपनारायण' हा लेख वाचल्यापासून हा सारखा म्हणतोय, "आपण एका रविवारी जाऊया हं." तो रविवार आज आला.
त्यानं कालच सांगितलं होतं, "जायचं तर चालत." त्याप्रमाणं कोल्हापूरच्या रेल्वे फाटकापासून आमची पायी यात्रा चालू झाली. ठरल्याप्रमाणे पहिला आम्ही रुपनारायणाची वाट धरली. अर्थातच वाट दाखवायला गुगलच्या त्या मॅडम होत्याच. तिथे गेल्या गेल्या मी ते दोन शिलालेख दाखविले, मग काय पाटलांनी ते मन लावून वाचून काढले. आत जाऊन आम्ही त्या नयनरम्य सप्तफणाधर परमदिगंबर रुपनारायणाचे दर्शन घेतले. क्षणभर आत बसल्यानंतर आम्ही बाहेरून मंदिर पाहिलं. शिलहारांनी रचलेले ते मोठमोठे दगड, त्या दगडांना आधार देणारे भव्य खांब हे सगळं अद्भुत होतं. त्या भिंतींना हात लावत फिरताना आम्हाला एक जाणवलं, की मंदिराचं कोरीवकाम करण्यासाठी वापरलेली अवजारे नक्कीच प्रगत होती. एकएक कट अजूनही तेवढाच तीक्ष्ण आहे. सजावट व नक्षीकाम थोडं कमी आहे, जे आहे ते मागच्या निम्म्या भागात आहे. त्यावरून आम्ही महान इतिहासकारांनी (just joking) निष्कर्ष काढला की मंदिराचं काम हळूहळू होत गेलं असावं, शिलालेखात लिहल्याप्रमाणे व्यापरावरचा कर जसा गोळा होत गेला त्यानुसार बांधकाम होत गेलं असावं. व अचानक आलेल्या काही अडचणींमुळे दर्शनी भागातील नक्षीकाम राहिलं असावं. या चर्चा करत आम्ही मंदिराच्या मजबूत चौथऱ्यावर बसलो होतो. त्यानं विचारलं अजून एखादं बघण्यासारखं काय हाय काय?
एक नेमीनाथ मंदिर हाय, तिथेच रंकभैरव मंदिरपण हाय दोन्ही एकाच कॅम्पस मध्ये आहेत. पण कूट हाय ते काय माहीत नाही.
मग काय आम्ही एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करत मोबाइल बाहेर काढले आणि रंकोबा डेस्टीनशन टाकलं, फक्त 850 मीटर अंतर आणि 15 मिनिट वेळ लागेल असं गुगलनं सांगितलं. अकराव्या मिनिटाला आम्ही तिथे पोचलो. तिथलं भव्य नेमीनाथ मंदिर शेजारी अवघ्या वीसएक फुटावर काटकोनात रंकोबा मंदिर, दोन्ही अतुलनीय!
आत गेल्यावर त्या मनोहर नेमीनाथाचं दर्शन घेतलं, पण मनात एक शंका होती ही दोन मंदिरं एकत्र कशीकाय? मी एकाला विचारलही! त्यांनी म्हटलं, इतिहास खूप वेगळा आहे, न विचारलेलाच बरा! पण नेमीनाथ कडक हाय!'
आजच मला कळलं तीर्थंकरपण कडक असतो ते. मी काय ते खूप मनावर घेतलं नाही. मला माहित आहे वीतरागी साम्यभावी असतो, त्या प्रचंड मोठ्या दगडी वेदीवर बसलेल्या चीरतपस्येतल्या काळ्या नेमीनाथाला पाहिल्यावरही तसंच वाटलं.
बाहेर येऊन तिथल्या पंडितांशी बोलणं झालं, चर्चा झाली. खूप आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या त्यांनी. एकेकाळी कुणीतरी नेमीनाथाला खंडित करून बाहेर कुठेतरी टाकलं होतं, खूप वर्षांनंतर कुणाला तरी साक्षात्कार झाला अन् त्याची पुनःस्थापणा झाली. आणखी एक गोष्ट इथे कळली, इथून एक भुयार आहे म्हणे. ते भुयार इथल्या एका प्रसिद्ध मंदिरापर्यंत आहे. (हे प्रसिद्ध मंदिर, कोल्हापुरात सापडलेल्या ताम्रपत्रानुसार शांतीनाथ मठ आहे, पण आज ती मूर्ती टाऊन हॉल संग्रहालयात आहे). काहीजण असेही म्हणतात की त्या भुयारात खूप मोठी संपत्ती आहे. सत्तर वर्षांपूर्वी दोन व्यक्तींनी त्यात प्रवेश केला होता, ते दोघे चार दिवसांनी परत आले. पण आत काय दिसलं हे ते सांगू शकले नाहीत; मात्र ते गुपित स्वतःजवळ ठेऊन दोघेही या पृथ्वीतलावरून चारच दिवसात निघून गेले म्हणे.
सत्य काय ते देवाला माहीत! आम्हाला मात्र मंदिर खूप आवडलं. नेमीनाथाला डोळेभरून पाहतच रहावं असं वाटत होतं.
अजून आमच्याकडे वेळ भरपूर होता. आम्ही लक्ष्मीसेन मठात जायचं ठरवलं, तेही 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. गुगल वाट दाखवेल तसे निघालो.
मठाचे भव्य प्रवेशद्वार एका नजरेत मावत नाही इतकं मोठं आहे. मठही तसाच मोठा आहे. भट्टारक स्वामींच्या द्रष्ट्या नेतृत्वात इथे साहित्य परिषद, ग्रंथालय, अश्या अनेक संस्थांची निर्मिती झाली आहे. इथली ज्वालामालिनी देवीची मूर्ती खूपच सुंदर आहे. नवरात्र व त्यात देवीचा वार रविवार असल्याने अळंकार पूजेची तयारी जोरात चालू होती.
नंतर आम्ही टाऊन हॉलला गेलो. कोल्हापुरात झालेल्या उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तू, मुर्त्या, तसेच अनेक कलाकारांनी काढलेली चित्रे, कोरलेली शिल्पे तिथे ठेवली आहेत.
पाचच्या सुमारास तिथून निघालो दसरा चौक मार्गे परत फटकाला आलो, येताना मित्राला विचारलं कसं वाटलं रे? तो म्हणाला "लई भारी वाटलं बघ! दिवस लई छान गेला, आज तृप्त झाल्यासारखं वाटतंय! इतिहासात डोकावल्याचा आनंद मिळाला बघ मला!
पण एक खंत राहिली आम्हाला केसापुर मंदिर, जिनसेन मठ व लक्ष्मीसेन याची भेट या तीन गोष्टी जमल्या नाहीत. "पुन्हा कधी आलो तर तेही करू" असं म्हणून आम्ही मनाचं समाधान करून घेतलं.
आज सात तास चालत फिरलो. तेही न जेवता! पाय थोडे दुखू लागलेत, पण आज त्या रुपनारायणाकडून घेतलेलं तेज आणि मनोहर नेमीनाथाकडून घेतलेली स्फूर्ती यांमुळे मी ते दुखणं विसरलोय!

ता.क.
येतायेता एक जाहिरात आठवली, त्यात बच्चन म्हणतो कुछ दिन गुजारो गुजरातमे.
आजच्या भटकंतीमुळे हेच वाक्य मी बदलून म्हटलं, कुछ घंटे चलते चलते घुमो कोल्हापूर में........
©सुरज मडके

स्ट्रगल, साथीदार आणि आपण


स्ट्रगल, साथीदार आणि आपण 
चारएक दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही रिसर्च स्टूडंट एकत्र बसलो होतो. बसल्याबसल्या चर्चा रंगल्या. चर्चेच्या एका वळणावर एका मित्रानं साथीदाराचा विषय काढला. लग्न करण्याचं योग्य वय काय? लग्न कधी करावं? कसं करावं? अश्या अनेक प्रश्नांवर प्रत्येकानं मतं मांडली. एकानं म्हटलं "तुमच्या struggle च्या काळात तुम्हाला साथीदार पाहिजे". संघर्षात तुम्हाला साथीदार असेल तर तो त्यात भागीदार होतो आणि संघर्ष निम्मा करतो.
वाक्य ऐकायला चांगलं होतं, असं असायला हरकत नाही. पण असं होत नाही ना! त्यामुळे मी आणि एकाने विरोधाची बाजू घेतली. वाढलेल्या अपेक्षा-attitude यावर आम्ही बोललो. त्यावर पुढचे दोघे idealism सांगू लागले. मग काय? चर्चेचं रूपांतर वादात! Idealism विरुद्ध Reality!
आदर्शवाद सांगणाऱ्यांचं काही चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही कारण आज ती काळाची गरज आहे. दोन सुशिक्षित साथीदार काम करून पोटापुरता पैसा मिळवू शकतात. उत्तम संसार करू शकतात. जगण्यासाठी काय लागतं? पोट चालवण्याइतका पैसा आणि एकमेकांवर प्रेम असलं की जगणं सुंदर होतं, संसार सुखाचा होतो.
पण! हा आदर्शवाद मानणारे लोक खूप कमी आहेत असं आमचं मत होतं. Struggle करणाऱ्याला आपली लेक द्यायला कुणीही तयार होत नाही. प्रत्येकाला आपला जावई लखपती, कोट्यधीश किंवा MNC कंपनीत मोठ्या पदावर असणारा पाहिजे असतो, कारण त्यांचं म्हणणं असतं, "आम्ही कमी पैशात दिवस काढलेत, माझ्या लेकीला ती झळ बसू नये."
कोल्हापूर-सांगली पट्ट्यात तर वरच्या अटीसोबत ४-५ एकर शेतीपण लागते.
यावर लगेच एकानं मला विचारलं "तुझं रान किती?"
मी म्हणालो "लई नाही ५-७ एकर हाय."
"मग गप्प बस की, होतय तुझं लगीन."
"अरे भावा मला माझी नाही रे बाकीच्यांची काळजी हाय."
अशाच हास्यविनोदात एकानं 'sample space' ही संकल्पना मांडली. खूप सुंदर आहे ही संकल्पना!
सर्व समाजातील सर्व व्यक्ती: सर्वात मोठा sample space (macro sample space)
आपल्याच समाजातील व्यक्ती: थोडा छोटा sample space
आपल्याच जातीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीनं शिकलेली: आणखी छोटा
सुंदर: आणखी छोटा
समजूतदार: सर्वात छोटा (micro sample space)
आपण आपल्याच आडमुठेपणामूळे हा sample space, macro चा micro करू लागलोय. त्यामुळे मोठा sample space मान्य करा आणि संसाराला लागा. अशी ही theory.
Sample space theory नुसार आपण सर्वसमावेशक असलं पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा idealism आदर्शवाद आला. पण समाजमन ही theory का मान्य करेल?
एवढयावर चर्चा संपली, सगळे आपापल्या कामासाठी निघून गेले. पण विचारचक्र चालू होतं.
विचार केला, आपला समाज हे मान्य करत नाही. पण नाकातोंडाला आल्यावर हेच लोक प्रतिहुंडा देऊन कर्नाटकातून साथीदार आणतात. काय म्हणायचं ह्याला????
वास्तव! खूप वेगळं आहे.
©सुरज मडके


रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...