रामाण्णा

रुपाली आज घाईत होती. भाऊबीजेसाठी तिनं आरतीचं ताट सजवलं होतं, जुन्या चांदीच्या निरंजनांत तिनं तूप घातलं, सैपाकघरात देव्हाऱ्यासमोरच्या बाजूला पाट मांडून सुंदर रांगोळी काढली. नंतर प्रतिकला त्या पाटावर बसवून त्याला ओवाळलं. ओवाळणी म्हणून प्रतीकनं वडिलांकडून घेतलेले पन्नास रुपये दिले. ओवळताना त्याची चेष्टामस्करी चालूच होती.
"मी तुला लाडू देणार नाही"
"पन्नास रुपयात लाडू देऊ व्हय तुला"
"दे गं दिदे, आतापूरतं दे, पुढच्या वर्षी हजार देतो"
"हे बाबा घे! लई आलाय हजार देणारा"
"द्यायलाच लागणार! कारण तू जाणार ना इथून"
"लई शहाणा हैस, गप्प खा लाडू"
रामाण्णा तिथंच बसून हे सगळं बघत होता. पण काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात कायतरी वेगळंच चालू होतं. चार दिवसांपूर्वीच बँकेची नोटीस आली होती. त्यादिवशीपासून हा असाच शांत-शांत होता.
एकेकाळी आख्या गावात त्याचा दरारा होता. त्याचं खरं नाव रामगोंडा पाटील. त्याचे वडील शिवगोंड पाटील! या शिवाप्पानं व्यसनापायी शेती घालवली. जी काय दोनतीन एकर शिल्लक जमीन होती त्यात कष्ट करून रामाण्णा बायको-पोरं आणि म्हाताऱ्या बापाला सांभाळत होता.
सगळं काही नीट चालू होतं. पण गेल्या चार वर्षात त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. काहीकेल्या कर्ज फिटत नव्हतं. दोन वर्षं पुरात पीक वाहून गेलं आणि दोन वर्षं दुष्काळात करपून गेलं. पण बँकेला त्याचं काय सुखदुःख? थोडंफार जे ऊसाचं पैसं यायचं ते सोसायची कट करून घ्यायची, वरचं काही हातात यायचं ते चटणीमिठाला संपायचं. त्यात लेकीचं लग्न तोंडावर होतं. त्या खर्चाचं टेन्शन पण होतंच त्याच्या उरावर.
हे सगळं टेन्शन लपवून तो लेकरांचं हसणं-खिदळणं बघत बसला होता. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मालकीणीनं दिलेला चहा अर्धाच सोडून तो उठला आणि तिला म्हणाला "जातो गं जरा रानात चाललोय."
"आवं च्या तर प्या की सगळा."
"राहूदे सोड, अर्धा....."
एवढं म्हणून तो शेतात गेला. थोडा वेळ त्यानं इकडंतिकडं केलं. काही वेळानं तो शेजारच्या चौगुल्याच्या तळावर गेला. तिथं नेमा चौगुल्याचा अभि होता. तो गोठ्यात जनावरं धूत होता.
रामण्णाला तिथं बघितल्यावर तो हातातलं काम सोडून त्याच्याकडं आला. आणि त्यानं विचारलं "आण्णा दिवाळी कशी गेली?"
"गेली बाबा, आली तशी गेली." "अबु! ते जरा 18 चा पाना असला तर दे"
"का ओ आण्णा?"
"चेंबर चालू करायचा हाय रे, जरा तण वाढलंय फवारणी करतो की, राऊंडअप आणलंय."
"पण पंप कुटं हाय ओ?"
"हाय रं रानात हाय तू दे लवकर"
एवढं बोलून रामाण्णा तिथून निघाला. तासाभराने तो परत आला. अभिला त्याचा पाना परत दिला. आणि म्हणाला "अबू, जरा पाणी देतोस काय रं? घसा कोरडा पडलाय."
अभि आतून पाणी घेऊन आला, त्याला तो पाणी देणार इतक्यात रामाण्णा कोसळला.
अभिला कळायचंच बंद झालं! रामाण्णाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानं राउंडअप तणावर मारलं नव्हतं.
अभिनं त्याच्या वडिलांना व काही मित्रांना फोन केला. त्याला त्यांनी दवाखान्यात नेलं. घरात बातमी कळली. सकाळी हसलेल्या घरात आता रडायला पण कुणी नव्हतं; सगळेच दवाखान्यात पोचले.
बघता बघता बातमी गावभर पसरली. गावात चर्चेला एक विषय लागतो ना! आयता विषय मिळाला होता रिकामटेकड्यांना. उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, काहींनी तर त्याच्या चारीत्र्यावरपण शिंतोडे उडवले. पण त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार?
अथक प्रयत्नांनी रामाण्णा वाचला, बायकोनं मंगळसूत्र गहाण ठेऊन दवाखाण्याचं बिल भरलं.
संध्याकाळी शुद्धीवर आल्यावर रामाण्णा दोन्ही लेकरांना मिठीत घेऊन ढसाढसा रडला…
आज रामाण्णा वाचला नसता तर तो एकटा सुटला असता पण कुटुंबाचं काय झालं असतं?
अयोध्येतील रामाची उंची १५० मीटर की २०० मीटर? या प्रश्नाचं उत्तर आज त्याच्यासमोर गौण आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? हा खरा प्रश्न आहे.
रुपाली, प्रतीक, त्याची बायको, त्याचा बाप हे सर्वजण आज आनंदाश्रू ढाळत आहेत, कारण त्यांचा डोंगराएवढा राम मृत्यूच्या दाढेतून परत आलाय ना!
©सुरज मडके

जोतिर्गमय

तिथी आजचीच! इसवी सन पूर्व ५२७ ची गोष्ट आहे; उत्तर भारतातील पावापुरी नगरीत ७२ वर्षे वयाचा एक चिरतरुण भ्रमण करीत आला होता. दिसताना तर तो विरक्त वाटत होता पण त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा खूप मोठा होता. उपदेश मात्र त्याग-अहिंसेचा करायचा. त्यामुळे जनसमान्यांना तो एक अवलियाच वाटायचा. त्याच्या मुखावर एक वेगळीच प्रभा होती. त्याचं शरीर तापलेल्या सोन्यासारखं तेजस्वी होतं. कदाचित ते त्याच्या तपाचं फळ होतं. त्याचं आणखी एक विशेष म्हणजे तो जिथं जाईल तिथे संपन्नता त्याच्या आधी यायची म्हणे!
असा हा किमयागार! त्याच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता प्रचंड होती. नुसते मानवच नाही तर पशुपक्षीही त्याच्या आश्रयाला थांबायचे. त्याचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. तो "ओम्" या शब्दाशिवाय काहीच बोलत नव्हता पण त्याच्या प्रत्येक ओम् चा अर्थ वेगळा होता. त्या ओमकार ध्वनित साऱ्या विश्वातील ज्ञान समावलं होतं असं सांगतात.
त्याच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार कळतो. त्याचा जन्म इ.पू.५९९ मध्ये वैशालीमधील कुंडलपुर येथे राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी झाला होता. तो त्यांचा एकुलता एक पुत्र! त्याच्या जन्मापूर्वीच स्वर्गातील देवांनी त्याच्या स्वागताची तयारी केली होती. तो गर्भात यायच्या काळात इंद्र-कुबेरानी त्याच्या जन्मोत्सवाचा जल्लोष कसा असेल याची झलक दाखवली होती. सारी प्रजा सुखसमृद्ध झाली राज्य वृद्धिंगत झालं. फक्त त्याच्या जन्मामुळं! म्हणूनच या बालकाचा नाव 'वर्धमान' ठेवण्यात आलं. हाच बालक त्याच्या बाललीलांमुळे प्रसिद्ध होऊन सन्मती, वीर, अतिवीर व महावीर या नावांनीही नावारूपास आला. तिसाव्या वर्षी त्यानं सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेतली बारा वर्षांच्या घोर तपानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. ते ज्ञान घेऊन तो ४० वर्षे जगभर फिरला. माणसातील देव जागा करायची आशा तो उराशी बाळगून होता. आता तो जीवनाच्या अंतिम सत्याजवळ होता. आयुकर्म संपवून त्याला सिद्धालयात जायचं होतं. त्यानं अमावस्येचा मुहूर्त साधला अन् अखेर तो तेजोमय ज्ञानसूर्य मावळला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्याचा शिष्य इंद्रभूती गौतम जो त्याची वाणी सर्वसामान्य जनतेस उलघडून सांगायचा त्यानं त्याचं दिवशी केवलज्ञान प्राप्त केलं. त्या काळोखात सूर्य सोडून गेला होता पण लगेचच एक दिवा प्रज्वलित झाला होता. आता ज्ञानाचा अंधार पडण्याची भीती राहिली नव्हती. म्हणूनच त्यावेेळीपासून ज्ञानाचा उत्सव दिव्यांनी साजरा करण्याची प्रथा पडली.
त्याच्या आयुष्यातील गर्भ, जन्म, दीक्षा, ज्ञान व निर्वाण या टप्यांना जैन संस्कृतीत कल्याणक असे संबोधतात. एकवेळ जन्म वगैरे कल्याणकारी असू शकतो पण निर्वाण (व्यवहार अर्थ: मृत्यू) हा कल्याणकारी कसा काय? डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात "अनेकांतवादाच्या दृष्टीनं पाहिलं तर मृत्यू हा फक्त देहाचा अंत असतो. त्याच्याकडे विघातक म्हणून न पाहता, विनाशक न मानता त्याला कल्याणक मानणं म्हणजे मृत्यूलाही अवीट सौंदर्य देणं आहे." आणि सर्वात महत्वाचं शरीराचा अंत हा ज्ञानाचा अंत नव्हताच मुळी! ते ज्ञान आजही जिवंत आहे. आणि तो तरी कुठं गेलाय? तो अजूनही जिवंत आहे आपल्यासारख्यांच्या हृदयामध्ये!
एक आर्त हाक द्या! त्याचं अस्तित्व नक्की जाणवेल.

*टीप:* सदर लेखात श्रीमदजिनेंद्र अंतिम तीर्थदेशना नायक भगवान महावीर यांचा एकेरी उल्लेख झाला आहे. हा उल्लेख आपुलकी व परमभक्तीपूर्वक केला आहे.
तसेच सहजपणा आणण्यासाठी काही ठिकाणी शास्त्रोक्त शब्द न वापरता व्यावहारिक शब्द वापरले आहेत.
©सुरज मडके

ती चांगलीच आहे


माहित नाही कशी आहे ती, अंदाज नाही मला तिचा
तरीही ती चांगलीच आहे.
फेसबुक व्हाट्सअप ला तासन्तास ऑनलाइन दिसते
तरीही ती चांगलीच आहे.
पोस्ट, कंमेंट, लाईक कधीच नसते; ऍक्टिव्हमात्र असते
तरीही ती चांगलीच आहे.
तिचं काही आहे-नाही, होतं-नव्हतं काही माहित नाही
तरीही ती चांगलीच आहे.
एका नजरेत आवडली, तिचा समजूतदारपणा भावला
पण ती समजूतदार असेलही- नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
पहिल्यांदाच हृदय दिलंय, तिला हृदय नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
भीती वाटते नकाराची, तिनं नाही म्हटलं तर?
तरीही ती चांगलीच आहे.
कधीकधी वाटतं धाडस करावं, एकदाचं विचारावं
पण! पण ती "हो" म्हणाली तर?
कारण ती चांगलीच आहे.
©सुरज मडके

कोल्हापूर दर्शन: माझ्यावर नजरेतून

काल संध्याकाळी गावाकडून सागर पाटलांचा फोन आला. "हं मी येतोय उद्या, रुपनारायण बघायला." माझा 'रुपनारायण' हा लेख वाचल्यापासून हा सारखा म्हणतोय, "आपण एका रविवारी जाऊया हं." तो रविवार आज आला.
त्यानं कालच सांगितलं होतं, "जायचं तर चालत." त्याप्रमाणं कोल्हापूरच्या रेल्वे फाटकापासून आमची पायी यात्रा चालू झाली. ठरल्याप्रमाणे पहिला आम्ही रुपनारायणाची वाट धरली. अर्थातच वाट दाखवायला गुगलच्या त्या मॅडम होत्याच. तिथे गेल्या गेल्या मी ते दोन शिलालेख दाखविले, मग काय पाटलांनी ते मन लावून वाचून काढले. आत जाऊन आम्ही त्या नयनरम्य सप्तफणाधर परमदिगंबर रुपनारायणाचे दर्शन घेतले. क्षणभर आत बसल्यानंतर आम्ही बाहेरून मंदिर पाहिलं. शिलहारांनी रचलेले ते मोठमोठे दगड, त्या दगडांना आधार देणारे भव्य खांब हे सगळं अद्भुत होतं. त्या भिंतींना हात लावत फिरताना आम्हाला एक जाणवलं, की मंदिराचं कोरीवकाम करण्यासाठी वापरलेली अवजारे नक्कीच प्रगत होती. एकएक कट अजूनही तेवढाच तीक्ष्ण आहे. सजावट व नक्षीकाम थोडं कमी आहे, जे आहे ते मागच्या निम्म्या भागात आहे. त्यावरून आम्ही महान इतिहासकारांनी (just joking) निष्कर्ष काढला की मंदिराचं काम हळूहळू होत गेलं असावं, शिलालेखात लिहल्याप्रमाणे व्यापरावरचा कर जसा गोळा होत गेला त्यानुसार बांधकाम होत गेलं असावं. व अचानक आलेल्या काही अडचणींमुळे दर्शनी भागातील नक्षीकाम राहिलं असावं. या चर्चा करत आम्ही मंदिराच्या मजबूत चौथऱ्यावर बसलो होतो. त्यानं विचारलं अजून एखादं बघण्यासारखं काय हाय काय?
एक नेमीनाथ मंदिर हाय, तिथेच रंकभैरव मंदिरपण हाय दोन्ही एकाच कॅम्पस मध्ये आहेत. पण कूट हाय ते काय माहीत नाही.
मग काय आम्ही एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करत मोबाइल बाहेर काढले आणि रंकोबा डेस्टीनशन टाकलं, फक्त 850 मीटर अंतर आणि 15 मिनिट वेळ लागेल असं गुगलनं सांगितलं. अकराव्या मिनिटाला आम्ही तिथे पोचलो. तिथलं भव्य नेमीनाथ मंदिर शेजारी अवघ्या वीसएक फुटावर काटकोनात रंकोबा मंदिर, दोन्ही अतुलनीय!
आत गेल्यावर त्या मनोहर नेमीनाथाचं दर्शन घेतलं, पण मनात एक शंका होती ही दोन मंदिरं एकत्र कशीकाय? मी एकाला विचारलही! त्यांनी म्हटलं, इतिहास खूप वेगळा आहे, न विचारलेलाच बरा! पण नेमीनाथ कडक हाय!'
आजच मला कळलं तीर्थंकरपण कडक असतो ते. मी काय ते खूप मनावर घेतलं नाही. मला माहित आहे वीतरागी साम्यभावी असतो, त्या प्रचंड मोठ्या दगडी वेदीवर बसलेल्या चीरतपस्येतल्या काळ्या नेमीनाथाला पाहिल्यावरही तसंच वाटलं.
बाहेर येऊन तिथल्या पंडितांशी बोलणं झालं, चर्चा झाली. खूप आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या त्यांनी. एकेकाळी कुणीतरी नेमीनाथाला खंडित करून बाहेर कुठेतरी टाकलं होतं, खूप वर्षांनंतर कुणाला तरी साक्षात्कार झाला अन् त्याची पुनःस्थापणा झाली. आणखी एक गोष्ट इथे कळली, इथून एक भुयार आहे म्हणे. ते भुयार इथल्या एका प्रसिद्ध मंदिरापर्यंत आहे. (हे प्रसिद्ध मंदिर, कोल्हापुरात सापडलेल्या ताम्रपत्रानुसार शांतीनाथ मठ आहे, पण आज ती मूर्ती टाऊन हॉल संग्रहालयात आहे). काहीजण असेही म्हणतात की त्या भुयारात खूप मोठी संपत्ती आहे. सत्तर वर्षांपूर्वी दोन व्यक्तींनी त्यात प्रवेश केला होता, ते दोघे चार दिवसांनी परत आले. पण आत काय दिसलं हे ते सांगू शकले नाहीत; मात्र ते गुपित स्वतःजवळ ठेऊन दोघेही या पृथ्वीतलावरून चारच दिवसात निघून गेले म्हणे.
सत्य काय ते देवाला माहीत! आम्हाला मात्र मंदिर खूप आवडलं. नेमीनाथाला डोळेभरून पाहतच रहावं असं वाटत होतं.
अजून आमच्याकडे वेळ भरपूर होता. आम्ही लक्ष्मीसेन मठात जायचं ठरवलं, तेही 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. गुगल वाट दाखवेल तसे निघालो.
मठाचे भव्य प्रवेशद्वार एका नजरेत मावत नाही इतकं मोठं आहे. मठही तसाच मोठा आहे. भट्टारक स्वामींच्या द्रष्ट्या नेतृत्वात इथे साहित्य परिषद, ग्रंथालय, अश्या अनेक संस्थांची निर्मिती झाली आहे. इथली ज्वालामालिनी देवीची मूर्ती खूपच सुंदर आहे. नवरात्र व त्यात देवीचा वार रविवार असल्याने अळंकार पूजेची तयारी जोरात चालू होती.
नंतर आम्ही टाऊन हॉलला गेलो. कोल्हापुरात झालेल्या उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तू, मुर्त्या, तसेच अनेक कलाकारांनी काढलेली चित्रे, कोरलेली शिल्पे तिथे ठेवली आहेत.
पाचच्या सुमारास तिथून निघालो दसरा चौक मार्गे परत फटकाला आलो, येताना मित्राला विचारलं कसं वाटलं रे? तो म्हणाला "लई भारी वाटलं बघ! दिवस लई छान गेला, आज तृप्त झाल्यासारखं वाटतंय! इतिहासात डोकावल्याचा आनंद मिळाला बघ मला!
पण एक खंत राहिली आम्हाला केसापुर मंदिर, जिनसेन मठ व लक्ष्मीसेन याची भेट या तीन गोष्टी जमल्या नाहीत. "पुन्हा कधी आलो तर तेही करू" असं म्हणून आम्ही मनाचं समाधान करून घेतलं.
आज सात तास चालत फिरलो. तेही न जेवता! पाय थोडे दुखू लागलेत, पण आज त्या रुपनारायणाकडून घेतलेलं तेज आणि मनोहर नेमीनाथाकडून घेतलेली स्फूर्ती यांमुळे मी ते दुखणं विसरलोय!

ता.क.
येतायेता एक जाहिरात आठवली, त्यात बच्चन म्हणतो कुछ दिन गुजारो गुजरातमे.
आजच्या भटकंतीमुळे हेच वाक्य मी बदलून म्हटलं, कुछ घंटे चलते चलते घुमो कोल्हापूर में........
©सुरज मडके

स्ट्रगल, साथीदार आणि आपण


स्ट्रगल, साथीदार आणि आपण 
चारएक दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही रिसर्च स्टूडंट एकत्र बसलो होतो. बसल्याबसल्या चर्चा रंगल्या. चर्चेच्या एका वळणावर एका मित्रानं साथीदाराचा विषय काढला. लग्न करण्याचं योग्य वय काय? लग्न कधी करावं? कसं करावं? अश्या अनेक प्रश्नांवर प्रत्येकानं मतं मांडली. एकानं म्हटलं "तुमच्या struggle च्या काळात तुम्हाला साथीदार पाहिजे". संघर्षात तुम्हाला साथीदार असेल तर तो त्यात भागीदार होतो आणि संघर्ष निम्मा करतो.
वाक्य ऐकायला चांगलं होतं, असं असायला हरकत नाही. पण असं होत नाही ना! त्यामुळे मी आणि एकाने विरोधाची बाजू घेतली. वाढलेल्या अपेक्षा-attitude यावर आम्ही बोललो. त्यावर पुढचे दोघे idealism सांगू लागले. मग काय? चर्चेचं रूपांतर वादात! Idealism विरुद्ध Reality!
आदर्शवाद सांगणाऱ्यांचं काही चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही कारण आज ती काळाची गरज आहे. दोन सुशिक्षित साथीदार काम करून पोटापुरता पैसा मिळवू शकतात. उत्तम संसार करू शकतात. जगण्यासाठी काय लागतं? पोट चालवण्याइतका पैसा आणि एकमेकांवर प्रेम असलं की जगणं सुंदर होतं, संसार सुखाचा होतो.
पण! हा आदर्शवाद मानणारे लोक खूप कमी आहेत असं आमचं मत होतं. Struggle करणाऱ्याला आपली लेक द्यायला कुणीही तयार होत नाही. प्रत्येकाला आपला जावई लखपती, कोट्यधीश किंवा MNC कंपनीत मोठ्या पदावर असणारा पाहिजे असतो, कारण त्यांचं म्हणणं असतं, "आम्ही कमी पैशात दिवस काढलेत, माझ्या लेकीला ती झळ बसू नये."
कोल्हापूर-सांगली पट्ट्यात तर वरच्या अटीसोबत ४-५ एकर शेतीपण लागते.
यावर लगेच एकानं मला विचारलं "तुझं रान किती?"
मी म्हणालो "लई नाही ५-७ एकर हाय."
"मग गप्प बस की, होतय तुझं लगीन."
"अरे भावा मला माझी नाही रे बाकीच्यांची काळजी हाय."
अशाच हास्यविनोदात एकानं 'sample space' ही संकल्पना मांडली. खूप सुंदर आहे ही संकल्पना!
सर्व समाजातील सर्व व्यक्ती: सर्वात मोठा sample space (macro sample space)
आपल्याच समाजातील व्यक्ती: थोडा छोटा sample space
आपल्याच जातीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीनं शिकलेली: आणखी छोटा
सुंदर: आणखी छोटा
समजूतदार: सर्वात छोटा (micro sample space)
आपण आपल्याच आडमुठेपणामूळे हा sample space, macro चा micro करू लागलोय. त्यामुळे मोठा sample space मान्य करा आणि संसाराला लागा. अशी ही theory.
Sample space theory नुसार आपण सर्वसमावेशक असलं पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा idealism आदर्शवाद आला. पण समाजमन ही theory का मान्य करेल?
एवढयावर चर्चा संपली, सगळे आपापल्या कामासाठी निघून गेले. पण विचारचक्र चालू होतं.
विचार केला, आपला समाज हे मान्य करत नाही. पण नाकातोंडाला आल्यावर हेच लोक प्रतिहुंडा देऊन कर्नाटकातून साथीदार आणतात. काय म्हणायचं ह्याला????
वास्तव! खूप वेगळं आहे.
©सुरज मडके


रूपनारायण

रूपनारायण
आज रविवार सुट्टीचा दिवस! एकदोन निमंत्रणं होती. पण गेलो नाही. कालच ठरवलं होतं रूपनारायण मंदिर बघून यायचं. कोल्हापुरात इतके दिवस झाले राहतोय, पण हे मंदिर पाहिलं नव्हतं.
सकाळी साडेसातला गूगल मॅपवर डेस्टीनेशन टाकलं आणि निघालो चालत. साडेपाच किमी अंतर दाखवत होतं. तरीही चालतचं राहिलो कारण मनाला ओढ लागली होती, दर्शनाची!
सलग एक तास चालल्यावर गूगलच्या बाईनं सांगितलं "तुम्ही पोचलाय, थांबा आता!" काळ्याकुट्ट दगडांमध्ये बांधलेल्या या मंदिराने इतिहासाची कित्येक पाने हृदयात सांभाळून ठेवली असतील! अंबाबाई मंदिरापासून जवळच असलेलं हे मंदिर तस्सच  हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आणि तेवढच जुनं आहे.
मला वाटलं होतं, मंदिर सुसज्ज असेल. पण तसं काही नाही. गंगावेशीतल्या उंचउंच इमारतींच्या आडोशाला याचं अस्तित्व थोडं झाकलं गेलंय. मंदिरासमोर एकीकडे जुन्या मुर्त्या दगडांच्या ढिगाऱ्यात पडल्यात तर दुसरीकडे अतिजीर्ण झालेलं एक घर आहे. एका कोपऱ्यात लोखंडी जाळीमध्ये दोन शिलालेख ठेवले आहेत, हे लेख प्राचीन कन्नड लिपीत आहेत. त्याचा मराठी अर्थ तिथेच डिजिटल बोर्डवर लिहला आहे.
मंदिरात आत जाण्या अगोदर हे सर्व पाहिलं. इतिहास जाणून घेतला. त्या शिलालेखात लिहलंय, "हे मंदिर पद्मावतीवरदहस्तप्राप्त शिलाहार महासामंत निम्बदेवराय याने एक हजार वर्षांपूर्वी बांधलं, शिलाहार महाक्षत्रिय श्रीमद गंडरादित्य याचा पुत्र (रुपनारायण) विजयादित्याने महादान दिल्यामुळे या मंदिरास 'रुपनारायण मंदिर' असे नाव प्राप्त झाले.
पुढे दुसऱ्या शिलालेखात मंदिराच्या व्यवस्थेसाठी कोल्हापुरातील व्यापारावर असलेले कर लिहले आहेत.
हे वाचत असताना उर भरून आला कारण मी आमचा गौरवशाली इतिहास वाचत होतो. पण एका क्षणानंतर थोडं वाईट वाटलं, कारण हा इतिहास आम्ही दुर्लक्षित ठेवलाय.
आता डोळे गच्च भरले होते, असाच आत गेलो. जीर्णोद्धाराचं काम सुरु आहे. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती बाहेर ठेवली होती. अन्य काही मुर्त्यादेखील तिथे होत्या. इथली प्रत्येक मूर्ती खूप सुरेख आहे, मनाला वाटतं की समोर प्रत्यक्ष देव बसला आहे.
अजूनही इथेच बसलोय, पाय निघेना इथून माझा! बाहेरच्या भिंतीवरची धूळ मी झाडून काढली. भिंतीच्या त्या काळ्या दगडांना माझा हात लागताच ती दगडं बोलू लागली, माझ्या पूर्वजांचा उज्ज्वल इतिहास सांगितला त्यांनी.
कधी आलात कोल्हापूरला तर नक्की बघा इथलं दुर्लक्षित सौंदर्य.
@सुरज मडके

आमचं बाकी मजेत हाय..

काही मुलाखती खूप गाजतात, कारण ती माणसंही गाजलेली असतात. म्हणूनच सहसा सामान्य माणसाची मुलाखत कुणी घेत नाही. कारण त्याची गाजत नाही.
कृष्णा-वारणा-पंचगंगेच्या खोऱ्यातल्या एका कलंदर माणसाची अशीच एक न गाजलेली मुलाखत..
त्याला विचारलेली प्रश्नं इथे दिली नाहीत, पण त्याच्या उत्तरांवरून प्रश्नाचा अंदाज नक्कीच येईल.

आमचं बाकी मजेत हाय..

उन्हाळा जरा जास्त हाय,
उकाडा पण वाढलाय,
पण आमचं बाकी मजेत हाय..
पाऊस जरा कमी हुता,
नदीचा काठ उघडा पडलाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
गावची जत्रा जवळ आल्या,
जत्रत लई फिरायचं हाय,
रानात कणसाचा पत्ता नाय,
निवद मात्र दाकवायचा हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
एकदोन माणसं मोठी झाली,
हाती पैसापाणी बक्कळ हाय,
त्यांचा शानपणाचा मक्ता हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
कायबी हुदे, खायला दोन घास,
आण प्याला पाणी हाय,
कारण कृष्णा-वारणाईची कृपा हाय,
म्हणूनच आमचं बाकी मजेत हाय..

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...