तिच्याबद्दल थोडेसे....

आज ती मला दिसली, माझ्याकडे बघून गालात हसली.  तसं आम्ही वरचेवर भेटत नाही. अन् भेटलो तर कधी बोलत नाही. दोन वर्षांपूर्वी एका फाईलच्या निमित्तानं भेटल्यावर एकदाच बोललो होतो. पण प्रत्येकवेळी भेटल्यावर आम्ही बोलत जरी नसलो तरी स्माईल नक्की देत होतो. पण आज तिचा इरादा काहीसा वेगळा वाटत होता.
ती सरळ माझ्यासमोर आली, आणि म्हणाली "मला काहीतरी सांगायचं आहे." मी म्हणालो "सांग ना, तु काहीही बोल, ऐकतो मी."
"नाही इथे नको, जाऊ कुठेतरी" ती म्हणाली.
मी आश्चर्याने "म्हणजे!"
‌त्यावर ती पुन्हा हसत म्हणाली, (आमच्या गावाकडच्या स्टाईल मध्ये) "अरे तुला काय मारत नाही मी, 'च्या' (चहा) प्यावसं वाटालयं, चल."
"बर बाई चल." मी आनंदान म्हणालो.
जाताजाता मला भूतकाळ आठवत होता, आमची पहिली भेट, ते जुने दिवस, मी तिला पाहीलेले, तिने मला पाहीलेले. कित्येक वर्षे झाली, आमची फक्त नजरानजर व्हायची, अन् मी नजर चोरून घ्यायचो. प्रत्येकवेळी असंच व्हायचं. माघार मीच घ्यायचो. पण आज चक्क तिनंच मला चहाला बोलवावं, घोर आश्चर्य!
डोक्यात हे विचारचक्र फिरत होतं, मात्र तोंड शांत होतं.
एकदोन मिनिटं चालल्यावर आम्ही कॅन्टीनला पोचलो. तिनंच दोन चहाची ऑर्डर दिली.
ती बोलण्याचा पवित्रा घेत म्हणाली "अरे",
पुढचं काहीच न बोलता ती थांबली.
आतातर त्या गजबजलेल्या कॅन्टीनमध्येही मला भयाण शांतता वाटत होती.
मी काहीच न बोलल्याचं पाहून तिनंच पुढाकार घेतला होता.
तोवर चहा आला. भरउन्हात पुरा गारठलो होतो मी. पटकन चहा तोंडाला लावून एक घोट घेतला. ओठाला चटका लागला होता. पण सांगतोय कुणाला? पण तिनं ते अचूक हेरलं, म्हणाली "हळू! काय गडबड हाय?" मी नुसती नकारार्थी मान डोलावली. मी गप्प बसलेलं पाहून ती अधिकारवाणीनं म्हणाली "तू बोलणार आहेस की नाही?"
मी काय बोलणार तिनं आज फक्त बोलत रहावं आणि मी ते ऐकत रहावं, असं मला वाटत होतं. तिचा कोमल आवाज मला खूप आवडायचा. पण त्या वेडीला ते कोण सांगणार?
तिनं मला विचारलं "तुला काय आवडतंय?"
माझा कावराबावरा चेहरा बघून म्हणाली "म्हणजे तुझी फेवरेट डिश सांग."
मी हळूच म्हणालो "पुरणपोळी".
"बापरे, मला काय ते येत नाही हं करायला." ती पटकन बोलून गेली पण चुकून बोलल्यासारखं दाताखाली जीभ चावली.
मला आणखीनच हुडहुडी भरली, "क क क क काय?" मला बोलताच येईना.
आता तीपण थोडी घाबरली होती, तिच्या एका वाक्यात खुपकाही अर्थ दडला होता.
तरीही ती म्हणाली "सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात काय? काही समजून घ्यायच्या असतात." माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी स्वतःला सावरलं. कारण मला माहीत आहे, लाडात वाढलेली लेक ती! तिला या फसव्या जगाची रित माहीत नाही.
मला काहीही न समजल्यासारखा खोटाखोटा निरागस भाव आणता आला असता. पण मी थोडा समंजसपणा दाखवत, धीरानं म्हणालो "अगं पण, ...."  तिनं मला थांबवलं, आणि म्हणाली "तू फक्त हो की नाही ते सांग."
मी: अगं पण माझी परिस्थिती....?
ती: काय वाईट आहे, तुझी परिस्थिती? सगळंच तर आहे तुझ्याकडे. काय कमी आहे तुझ्यात?
मी: तरी पण....
ती: हे बघ! मी खूप साधी मुलगी आहे. साधं जगणं येतंय मला.
मी: अगं तुला कोणीही भेटेल, तुला सुखात ठेवणारा.
ती: म्हणजे तू मला सुखात ठेवू शकत नाहीस?
मी: अगं तसं नाही!
ती: मग कसं?
मी: तुला सांगून पटणार नाही!
ती: खरं सांग, मी तुला इतर मुलींप्रमाणेच वाटते ना?
मी: तसं नाही गं!
तिचा पारा आता खुपंच चढला होता. रागरागत ती म्हणाली "सरळ सांग, तुझा माझ्यावर भरोसा नाही ना?"
मी काहीच बोलायच्या आत ती उठून निघून गेली.
पण माझ्या सोनूनं त्या भरोश्याच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला पाहिजे होतं. परिस्थितीत अडकलेल्या आणि काळाच्या बंधनात सापडलेल्या तिच्या सोन्याचं मन तिनं जाणायला हवं होतं.
असो! ती उठून गेली, पण मी अजून तिथेच होतो, तिचाच विचार करत.
क्षणभर वाटलं की हे स्वप्नतर नाही ना? पण माझ्यासमोर चहाचे ते दोन ओले कप व तिचा नाव लिहलेला रुमाल अजून तसेच होते.
इतक्यात आईने जोरात हाक मारली आणि मी डोळे उघडले.

शमनेवाडीतील शांतीसागर पुण्यतिथी: वर्णन

आज दिवसभर कर्नाटकातील शमनेवाडी येथे होतो, निमित्त होतं प्रथमाचार्य शांतीसागर पुण्यतिथीचं. तो नेत्ररम्य सोहळा मनाला भुरळ घालणारा. दहाबारा रथ, हत्ती, वीसभर घोडे, वीस ते पंचवीस ढोलताशा व झांजपथके (महिलांचेपण) असा लवाजमा घेऊन निघालेली ती रॅली जवळजवळ चार किमी लांब, त्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा, ढोल ताशे वाजवताना त्याच्या पानांसोबत वाजवणाऱ्यांची बोटंपण फुटायची, पण तेच रक्तबंबाळ हात पुन्हा वाद्यावर पडायचे, पण त्यांना त्याचं भान नव्हतं, मग कुणीतरी येऊन पट्टी बांधायचा, पण आमचा कार्यकर्ता थांबत नव्हता, शेवटी शेतात नांगर धरणारे हात ते, त्यांना कसलं आलंय दुःख. त्यांचं नाचत उड्या मारत (होय उड्या मारतच) ढोल वाजवणं चालूच राहिलं. हे झालं आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या रणरागिणीपण काही कमी नव्हत्या, रोज लाटनं आणि उलातणं बाळगणाऱ्या हातातही आज ढोल ताशे व झेंडे होते. लहान मुलींपासून वृद्ध महिला सक्रिय सहभागी होत्या. एक आज्जी, सत्तर वयाची असेल, ती हातात झेंडाघेऊन मुलींच्या एका पथकासमोर मिरवत होती, जणू काय ती त्या मुलींना एकप्रकारे प्रोत्साहनच देत होती. आणि विशेष सांगायचं म्हणजे सकाळी १०ला सुरु झालेली ही मिरवणूक दुपारी ३च्या सुमारास संपली, पण भर उन्हातही त्यातल्या एकाही वाघिणीने सावलीची आस धरली नाही. तिथे जमलेल्या दोन लाख लोकांची मनं जिंकली या कार्यकर्त्यांनी. या रॅलीत वाद्यवृंदाबरोबरच चित्ररथ व देखावेदेखील होते त्यात दक्षिणेतील जैन संस्कृतीसोबत स्त्रीभ्रूणहत्या, शेतकरीआत्महत्या, स्वदेशी, स्त्रीशक्ती इत्यादी ज्वलंत विषय मांडले होते.
तीनला मुख्य सोहळा सुरु झाला, अध्यक्ष रावसाहेब पाटील, कल्लाप्पाण्णा आवडे, अरविंद मजलेकर, खा. राजू शेट्टी, खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, आ. संजय पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरवात झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रमुख अतिथी होते. पण अनारोग्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कार्यक्रम म्हटलं कि सत्कार आलाच, जेव्हा खा. हुक्केरी यांचं नाव घेण्यात आलं तेव्हा तो पिळदार मिशीचा व भरदार शरीरयष्टीचा माणूस आपल्या पहाडी आवाजात म्हणाला (कानडीमध्ये) "ना मुंदिन कार्यक्रमगे मुख्यमंत्रीगे तराव मती सत्कार त्वगुळाव" म्हणजे पुढच्या कार्यक्रमात मी मुख्यमंत्र्याला घेऊन शमनेवाडीला येईन तेव्हाच सत्कार घेईन. काय तो टाळ्यांचा कडकडाट, एका वाक्यात सर्वांची मनं जिंकली ह्या माणसानं. नंतर झालेल्या राष्ट्रसंत आचार्य गुणधरनंदी यांच्या प्रवचनावेळी तर सर्वांच्या नयनात पाणी, अंगावर शहारे आणि रक्तात सळसळ भरली. खरंच प्रवचन ऐकावं तर जैन मुनींचंच, खरंच खूपचं सडेतोड असतं ते. नंतर आम्ही ऐकलं ते राजू शेट्टींना, खूपच लोकप्रिय माणूस (कर्नाटकातही), ते भाषणाला उभे राहिले अन टाळ्या व शिट्यांचा एकच आवाज चालू झाला. ज्या माणसामुळे आमच्या उसाला 3000 भाव मिळाला त्यासाठी हे साहजिक होतं. शेवटी नंबर होता आ. संजय पाटलांचा. संजय पाटील मूळचे महाराष्ट्रातील हालोंडीचे पण सद्या ते बेळगावचे आमदार आहेत. इथे शेट्टी व पाटील दोन राजकारण्यांची भाषणे झाली, पण त्यात राजकारणाचा लवलेशही नव्हता, ते दोघेही आज राजकारणी नव्हते, असतील तर ते फक्त धर्मकारणी व धर्मप्रेमी.
शेवटी संध्याकाळी ५वाजता तिथून निघालो, तिथल्या गोड व आनंददायी आठवणी घेऊन. पुढच्या वर्षीच्या सोहळ्याची सोनेरी स्वप्नं रंगवत. 

विशेष: हा पुण्यतिथीचा सोहळा दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो, या वर्षी तो सन्मान धर्मनगरी शमनेवाडीला मिळाला. किमान २लाख भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला,  किमान१५ लाख रुपये खर्च झाले, काहींना प्रश्न पडेल की एवढं सगळं कशासाठी?
ज्या चरित्रचक्रवर्ती प्रथमाचार्यशांतीसागर महाराजांनी (पूर्वश्रमीचे नाव:सातगोंडा भीमगोंडा पाटील), खंडीत झालेली जैन मुनिपरंपरा पुनःस्थापित केली, आम्हाला आमच्या खऱ्या मानव धर्माची ओळख करून दिली, जे धर्माच्या अस्तित्वासाठी दिल्लीच्या तख्ताला भिडले, ज्यांनी आमचा स्वाभिमान जागा केला व ज्यांच्या पुण्याईमुळे आमचे जैनत्व सिद्ध झाले त्या पुण्यात्माच्या स्मृतिप्रीत्यर्थ "इतना तो बनता है ना?"

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...