रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्रत्येकाला एकदातरी पडला असेलच. काहीजण मनाला अनंत अशी उपमा देतात कारण मनाची परिमिती त्याचा आदी-अंत कधीच लागत नाही. एकांतवासात विचारमग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहून आपण सहज म्हणतो, "अरे! कुठे शून्यात हरवलायस?" खरं पहिलं तर असा व्यक्ति आपल्यासाठी शून्यात असतो पण तो स्वतः विचारांच्या अनंत चक्रात फिरत असतो. अध्यात्मात आपण अनंतसुख, अनंतपद अश्या शब्दांना सामोरं जात असतो, पण अनंत म्हणजे किती हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. दहावीच्या त्रिकोणमितीत आपण tan 90 ची किंमत इंफिनिटी पाठ केली असेल. गणितामध्ये कोणत्याही संख्येला शून्याने भागले असता येणारे उत्तर इंफिनिटी असते. पण त्याची यथार्थ व्याख्या अजूनही पुसट आहे. विज्ञानाच्या गणितराणीचं हे कोडं विज्ञानराज भौतिकशास्त्रालाही सप्रमाण सोडवण्यात फारसं यश आलंय असं सांगता येणार नाही. अध्यात्मातलं 'अनंत' ज्यांने मिळवलंय त्यालाच माहीत!

जवळजवळ सव्वा शतकांपूर्वी भारतात एक असा माणूस होऊन गेला ज्यानं अंक आणि अध्यात्म यांची सांगड घालून दोन्हीतलं अनंत अनुभवलं. त्या अवलियाचं नाव श्रीनिवास रामानुजन! २२ डिसेंबर १८८७ साली तत्कालीन मद्रास प्रांतात जन्मलेल्या रामानुजनचं रॉबर्ट कॅनिगेलने लिहलेलं "The Man Who Knew Infinity" हे जीवनचरित्र प्रसिद्ध आहे, त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट हॉलीवुडने २०१५ साली प्रदर्शित केला. ब्रिटिश अभिनेता देव पटेल व अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे यांनी त्यात रामानुजन व पत्नी जानकीअम्मल ही जोडी उत्तम साकारली आहे. रामानुजन ह्या व्यक्तीने आयुष्य गणिताला समर्पित केलं होतं, त्यामुळे अर्थातच पती-पत्नीच्या नात्यापेक्षा प्रा. हार्डी यांच्यासोबतचा त्यांचा संवाद या चित्रपटात पहायला मिळतो. त्यातील एका संवादात रामानुजन म्हणतो, "मी माझं आयुष्य गणिताला अर्पण केलंय". लहानवयात त्याने सोडवलेली अवघड गणितं आणि मांडलेली प्रमेयं त्याच्या अपूर्व बुद्धिमत्तेची व समर्पणाची साक्ष देतात. त्याला जळी-स्थळी जणू गणित दिसायचं अंकांशी खेळण्यासाठी त्याला मंदिरातल्या पाषाणशिलाही कमी पडायच्या. गणिताचं हे वेड त्याच्या डिग्रीच्या आड आलं, गणितात प्रवीण असणारा रामानुजन इतर विषयात खूप कमी पडला, त्यामुळं कॉलेजची डिग्री तो मिळवू शकला नव्हता.

मॅट्रिकच्या शिक्षणावर त्यानं नोकरी मिळवली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं. त्याच्या काही हितचिंतकांनी त्याचं संशोधनकार्य केंब्रिजच्या प्रा. हार्डी यांच्यापर्यंत पोचवण्यास मदत केली. कालांतराने रामानुजनला प्रा. हार्डींकडे जाऊन एकत्र काम करण्यासाठी संधी मिळाली. अट्टल धार्मिक संस्कार असलेल्या घरात समुद्रलंघनाला विरोध साहजिक होता. पण जानकीअम्मलच्या मध्यस्थीमुळे अखेर विरोध निवळला. इंग्लंडला जाताना "तिथे जाऊन स्वतःला बाटवून घेऊ नकोस, धार्मिक संस्कार विसरू नकोस" असं सांगायला त्याची आई विसरली नव्हती. जानकीने तर हृदयावर दगड ठेवून त्याला निरोप दिला होता.

तिकडे गेल्यावर त्याने आईचा शब्द शेवटपर्यंत मोडला नाही, शाकाहार-देवपूजा याबाबतीत त्याने कधीच तडजोड केली नाही. गणिताची आवड त्याला तिथेही होतीच मात्र संसाराची ओढही होती. एका प्रसंगात रामानुजन प्रा. हार्डींना म्हणतो, "मी विवाहित आहे, मला माझं संशोधन पब्लिश करून लवकर घरी जायचंय."

तरुण रक्ताचा रामानुजन व मुरब्बी हार्डी यांच्यातील संवाद जीवन शिकवतो. रामानुजनला पब्लिकेशनची घाई होती, त्याचं अनाकलनीय संशोधन जगापुढे मांडायला तो उतावीळ झाला होता, मात्र "ये बेरहम जमाना प्रूफ मांगता है" असं त्याला समजेल अश्या भाषेत सांगून हार्डींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही हट्टाला पेटलेल्या रामानुजनला त्यांनी ग्रंथालयात नेऊन महान गणिततज्ज्ञांच्या वह्या दाखवल्या आणि भविष्यात तुझीही वही इथे असली पाहिजे अशी अंतःप्रेरणा त्याच्या मनात जागवली. त्याला वर्गात बसवून त्याची B.Sc. डिग्री पूर्ण करून घेतली. त्यांनी त्याच्या सिद्धांत मांडणीतील उड्या व त्रुटी दाखवून दिल्या. सहकारी म्हणून आला असला तरी रामानुजन एका अर्थाने हार्डींचा विद्यार्थीच होता. एक हितदक्ष शिक्षक विद्यार्थ्याची किती काळजी करतो हे हार्डींनी दाखवून दिलं. त्याची तब्येत बिघडल्यावर हार्डींनी त्याची खूप काळजी घेतली. त्रिनीटी कॉलेजकडून त्याला फेलोशिप मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले पण त्यांना त्यात अपयश आलं मग त्यांनी रॉयल सोसायटीच्या दरबारात कित्येकांचा विरोध पत्करून रामानुजनची शिफारस केली, त्यात त्यांना यश आलं त्यानंतर त्रिनीटी कॉलेजनेही रामानुजनला फेलोशिप बहाल केली.

एकदा हार्डींनी रामानुजनला त्याच्या गणितातल्या अद्भुत किमयेबद्दल विचारलं, त्यावर रामानुजनने आपल्यावर कुलदेवता नामगिरी देवीचा वरदहस्त असल्याचे सांगितले; त्याच्या प्रत्येक गणितिय कर्तुत्वचं श्रेय तो त्या देवीला द्यायचा.  ती देवी त्याला गणिताच्या उकली सांगायची अश्या कथाही काहीवेळेस रंगवल्या जातात. त्याचा दैववाद इतका प्रबळ होता की तो म्हणायचा की, "ज्या समीकरणात दैवी विचारांची मांडणी नसते ते माझ्यासाठी अर्थहीन आहेत." त्याच्या आयुष्यात त्याचं आजारांशीदेखील एक समीकरण जुळलं होतं, तरीही त्याच्या मनातली ईश्वराप्रति श्रद्धा अढळ राहिली हेही एक विशेष मानायला हवं.

त्याचे दुसरे सहकारी प्रा. लिटलवूड रामानुजनबद्दल म्हणाले होते, "सगळे धन पूर्णांक (positive integer) रामानुजनचे वैयक्तिक मित्र होते." खरंच आहे, नेहमी रामानुजनभोवती सावलीप्रमाणे घुटमळणाऱ्या अंकांना मित्र नाहीतर अजून काय म्हणावं?

त्यानं तिथं राहून भरपूर संशोधन केलं, पण आजारपण आणि कुटुंबाच्या ओढीमुळे त्याचा जीव तळमळत होता. पण, त्या गणिती हृदयाला सावरकरांप्रमाणे "ने मजसी ने परत मातृभूमीला........" असं काव्य करता आलं नाही एवढचं!

अखेर तो १९१९ साली भारतात परतला. यश, कीर्ती व नाव मिळवून आलेल्या रामानुजनसोबत अंक व आजारपण हे जुने सोबती होतेच. मृत्यूशय्येवरदेखील रामानुजनने अंकसख्यांशी खेळणं सोडलं नाही, अजूनही तो प्रा. हार्डींसोबत पत्रव्यवहार करतच होता. खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी अंक सखे झाले होते. अनंत संख्यांशी खेळत खेळत वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी २६ एप्रिल १९२० ला अनंत काय असतं हे न सांगताच तो अनंतात विलीन झाला.

त्यानं मांडलेल्या समीकरणांच्या रूपात तो अजूनही जीवंत आहे. मृत्यूनंतरही तो अनेक गणिततज्ज्ञ व शास्त्रज्ञांसाठी दीपस्तंभ म्हणून राहिला. नेचर नियतकालिकाने त्याला Calendar of Scientific Pioneers च्या यादीत स्थान दिलं, भारतात त्याचा जन्मदिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा होतो, त्याच्या नावे अनेक पुरस्कार व छात्रवृत्या विविध संस्थांकडून वितरित होतात. त्याचं स्मारकदेखील तयार केलं गेलंय. एवढ्या सगळ्या त्याच्या कार्यकर्तुत्वात जानकीअम्मलचं स्थानही खूप मोठं आहे. कारण तिच्या त्याग व पाठबळातून रामानुजन नावारूपास आला, हे नाकारून चालणार नाही. प्रत्येक रामाला अश्या जानकीची उज्ज्वल साथ गरजेची असतेच, हे ह्या जोडीनं पुन्हा सिद्ध केलंय.

✍सुरज मडके, केशव राजपुरे
भौतिकशास्त्र अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

वीरगळ


काही दिवसांपूर्वी  कोल्हापूर जवळच्या कसबा बीड येथे वीरगळ संग्रह पाहण्याची संधी मिळाली. काहींना वीरगळ हा प्रकार कदाचित माहीत नसेल. वीरगळ म्हणजे युद्धात हौतात्म्य आलेल्या वीराच्या स्मरणार्थ  कोरलेलं एक दगडी शिल्प असतं, त्या शिल्पात युद्धप्रसंग व त्या वीराचं स्वर्गारोहण दाखवलेलं असतं. वीरगळात मुख्यत्वेकरून एकावरएक असे तीन भाग असतात. काही वीरगळ चार-पाच भागांचेही असतात. मात्र तीन भागांचे वीरगळ मोठ्याप्रमाणात सापडतात. सर्वात खालच्या भागात योद्धा धारातीर्थी पडताना दाखविलेला असतो, त्या वीराला हौतात्म्य नेमकं कसं आलं म्हणजे त्याच्याकडे कोणतं शस्त्र होतं, त्याला कोणत्या शस्त्राने मारलं गेलं हे दाखविलेलं असतं. मधल्या भागात स्वर्गातील अप्सरा (किंवा देवदूत) त्याला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग असतो. वरच्या भागात तो वीर स्वर्गात इष्टदेवाची पूजा करत असल्याचे दाखवलेले असते. हे शिल्प अडीच ते तीन फुट उंचीचे असते. वीरगळ हा प्रकार कर्नाटकातून महाराष्ट्रात आला अशी मान्यता आहे. कानडी भाषेत याला वीरकल्लू (वीराचा दगड) असे म्हणतात. वीरगळ कोरण्याची परंपरा इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. स. अठराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.
आजपर्यंत सापडलेल्या सर्वच वीरगळात वरच्या भागात वीर स्वर्गात शिवलिंगाची पूजा करीत असल्याचे दाखविले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापुर व परिसरात अनेक वीरगळ सापडले आहेत. इतर वीरगळांप्रमाणे त्यातही शिवलिंग दाखविले आहेत. मात्र कोल्हापुरातल्या नूतन मराठी विद्यालयाजवळच्या विठ्ठल-ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेला एक वीरगळ इतरांहून थोडा वेगळा दिसतो. तीन भागांच्या ह्या वीरगळातील खालचे दोन भाग स्पष्ट आहेत व वरच्या भागाचा अगदी थोडा भाग दिसतो. खालच्या भागात हत्तीवरील योद्ध्याकडून एक वीर धारातीर्थी पडताना दिसतो, मधल्या भागात अपेक्षेप्रमाणे त्याचं स्वर्गारोहण आहे, तिसरा भाग तुटल्यामुळे तो स्पष्ट नाही मात्र वरच्या भागात पद्मासन घातलेल्या देवाची प्रतिमा असावी असे वाटते, कारण वरच्या भागातील पद्मासन अवस्थेतील पाय स्पष्ट दिसतात. कोल्हापूरचा प्राचीन इतिहास, उत्खननातील विविध ऐतिहासिक पुरावे व तो वीरगळ जेथे आहे त्या परिसरातील वास्तू यांचा विचार केल्यास त्या वीरगळात पद्मासनस्थ जैन तीर्थंकर प्रतिमा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात बाराव्या शतकापर्यंत चालुक्य व शिलाहार ह्या जैन राजवटी होत्या त्यामुळे ही शक्यता अधिक प्रबळ होते. कदाचित तो जैन वीरगळ असेलही....
कर्नाटकातील काही वीरगळावर शिलालेख आढळतात, मात्र महाराष्ट्रात असे शिलालेख असलेले वीरगळ क्वचित आहेत; किंबहुना नाहीतच. म्हणूनच वीरगळांना ‘इतिहासाचे मुक साक्षीदार’ असेही म्हणतात. मी पाहिलेला तो वीरगळ कदाचित इतरांहून वेगळा असेलही.... मात्र तोही मुक साक्षीदार असल्याने बोलत नाही. आणि ती अबोल भाषा कळणारे त्याच्याकडे बघत नाहीत. हीच शोकांतिका आहे....
सुरज मडके
भौतिकशास्त्र अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
८२०८२८३०६९


रामाण्णा

रुपाली आज घाईत होती. भाऊबीजेसाठी तिनं आरतीचं ताट सजवलं होतं, जुन्या चांदीच्या निरंजनांत तिनं तूप घातलं, सैपाकघरात देव्हाऱ्यासमोरच्या बाजूला पाट मांडून सुंदर रांगोळी काढली. नंतर प्रतिकला त्या पाटावर बसवून त्याला ओवाळलं. ओवाळणी म्हणून प्रतीकनं वडिलांकडून घेतलेले पन्नास रुपये दिले. ओवळताना त्याची चेष्टामस्करी चालूच होती.
"मी तुला लाडू देणार नाही"
"पन्नास रुपयात लाडू देऊ व्हय तुला"
"दे गं दिदे, आतापूरतं दे, पुढच्या वर्षी हजार देतो"
"हे बाबा घे! लई आलाय हजार देणारा"
"द्यायलाच लागणार! कारण तू जाणार ना इथून"
"लई शहाणा हैस, गप्प खा लाडू"
रामाण्णा तिथंच बसून हे सगळं बघत होता. पण काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात कायतरी वेगळंच चालू होतं. चार दिवसांपूर्वीच बँकेची नोटीस आली होती. त्यादिवशीपासून हा असाच शांत-शांत होता.
एकेकाळी आख्या गावात त्याचा दरारा होता. त्याचं खरं नाव रामगोंडा पाटील. त्याचे वडील शिवगोंड पाटील! या शिवाप्पानं व्यसनापायी शेती घालवली. जी काय दोनतीन एकर शिल्लक जमीन होती त्यात कष्ट करून रामाण्णा बायको-पोरं आणि म्हाताऱ्या बापाला सांभाळत होता.
सगळं काही नीट चालू होतं. पण गेल्या चार वर्षात त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. काहीकेल्या कर्ज फिटत नव्हतं. दोन वर्षं पुरात पीक वाहून गेलं आणि दोन वर्षं दुष्काळात करपून गेलं. पण बँकेला त्याचं काय सुखदुःख? थोडंफार जे ऊसाचं पैसं यायचं ते सोसायची कट करून घ्यायची, वरचं काही हातात यायचं ते चटणीमिठाला संपायचं. त्यात लेकीचं लग्न तोंडावर होतं. त्या खर्चाचं टेन्शन पण होतंच त्याच्या उरावर.
हे सगळं टेन्शन लपवून तो लेकरांचं हसणं-खिदळणं बघत बसला होता. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मालकीणीनं दिलेला चहा अर्धाच सोडून तो उठला आणि तिला म्हणाला "जातो गं जरा रानात चाललोय."
"आवं च्या तर प्या की सगळा."
"राहूदे सोड, अर्धा....."
एवढं म्हणून तो शेतात गेला. थोडा वेळ त्यानं इकडंतिकडं केलं. काही वेळानं तो शेजारच्या चौगुल्याच्या तळावर गेला. तिथं नेमा चौगुल्याचा अभि होता. तो गोठ्यात जनावरं धूत होता.
रामण्णाला तिथं बघितल्यावर तो हातातलं काम सोडून त्याच्याकडं आला. आणि त्यानं विचारलं "आण्णा दिवाळी कशी गेली?"
"गेली बाबा, आली तशी गेली." "अबु! ते जरा 18 चा पाना असला तर दे"
"का ओ आण्णा?"
"चेंबर चालू करायचा हाय रे, जरा तण वाढलंय फवारणी करतो की, राऊंडअप आणलंय."
"पण पंप कुटं हाय ओ?"
"हाय रं रानात हाय तू दे लवकर"
एवढं बोलून रामाण्णा तिथून निघाला. तासाभराने तो परत आला. अभिला त्याचा पाना परत दिला. आणि म्हणाला "अबू, जरा पाणी देतोस काय रं? घसा कोरडा पडलाय."
अभि आतून पाणी घेऊन आला, त्याला तो पाणी देणार इतक्यात रामाण्णा कोसळला.
अभिला कळायचंच बंद झालं! रामाण्णाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानं राउंडअप तणावर मारलं नव्हतं.
अभिनं त्याच्या वडिलांना व काही मित्रांना फोन केला. त्याला त्यांनी दवाखान्यात नेलं. घरात बातमी कळली. सकाळी हसलेल्या घरात आता रडायला पण कुणी नव्हतं; सगळेच दवाखान्यात पोचले.
बघता बघता बातमी गावभर पसरली. गावात चर्चेला एक विषय लागतो ना! आयता विषय मिळाला होता रिकामटेकड्यांना. उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, काहींनी तर त्याच्या चारीत्र्यावरपण शिंतोडे उडवले. पण त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार?
अथक प्रयत्नांनी रामाण्णा वाचला, बायकोनं मंगळसूत्र गहाण ठेऊन दवाखाण्याचं बिल भरलं.
संध्याकाळी शुद्धीवर आल्यावर रामाण्णा दोन्ही लेकरांना मिठीत घेऊन ढसाढसा रडला…
आज रामाण्णा वाचला नसता तर तो एकटा सुटला असता पण कुटुंबाचं काय झालं असतं?
अयोध्येतील रामाची उंची १५० मीटर की २०० मीटर? या प्रश्नाचं उत्तर आज त्याच्यासमोर गौण आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? हा खरा प्रश्न आहे.
रुपाली, प्रतीक, त्याची बायको, त्याचा बाप हे सर्वजण आज आनंदाश्रू ढाळत आहेत, कारण त्यांचा डोंगराएवढा राम मृत्यूच्या दाढेतून परत आलाय ना!
©सुरज मडके

जोतिर्गमय

तिथी आजचीच! इसवी सन पूर्व ५२७ ची गोष्ट आहे; उत्तर भारतातील पावापुरी नगरीत ७२ वर्षे वयाचा एक चिरतरुण भ्रमण करीत आला होता. दिसताना तर तो विरक्त वाटत होता पण त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा खूप मोठा होता. उपदेश मात्र त्याग-अहिंसेचा करायचा. त्यामुळे जनसमान्यांना तो एक अवलियाच वाटायचा. त्याच्या मुखावर एक वेगळीच प्रभा होती. त्याचं शरीर तापलेल्या सोन्यासारखं तेजस्वी होतं. कदाचित ते त्याच्या तपाचं फळ होतं. त्याचं आणखी एक विशेष म्हणजे तो जिथं जाईल तिथे संपन्नता त्याच्या आधी यायची म्हणे!
असा हा किमयागार! त्याच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता प्रचंड होती. नुसते मानवच नाही तर पशुपक्षीही त्याच्या आश्रयाला थांबायचे. त्याचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. तो "ओम्" या शब्दाशिवाय काहीच बोलत नव्हता पण त्याच्या प्रत्येक ओम् चा अर्थ वेगळा होता. त्या ओमकार ध्वनित साऱ्या विश्वातील ज्ञान समावलं होतं असं सांगतात.
त्याच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार कळतो. त्याचा जन्म इ.पू.५९९ मध्ये वैशालीमधील कुंडलपुर येथे राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी झाला होता. तो त्यांचा एकुलता एक पुत्र! त्याच्या जन्मापूर्वीच स्वर्गातील देवांनी त्याच्या स्वागताची तयारी केली होती. तो गर्भात यायच्या काळात इंद्र-कुबेरानी त्याच्या जन्मोत्सवाचा जल्लोष कसा असेल याची झलक दाखवली होती. सारी प्रजा सुखसमृद्ध झाली राज्य वृद्धिंगत झालं. फक्त त्याच्या जन्मामुळं! म्हणूनच या बालकाचा नाव 'वर्धमान' ठेवण्यात आलं. हाच बालक त्याच्या बाललीलांमुळे प्रसिद्ध होऊन सन्मती, वीर, अतिवीर व महावीर या नावांनीही नावारूपास आला. तिसाव्या वर्षी त्यानं सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेतली बारा वर्षांच्या घोर तपानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. ते ज्ञान घेऊन तो ४० वर्षे जगभर फिरला. माणसातील देव जागा करायची आशा तो उराशी बाळगून होता. आता तो जीवनाच्या अंतिम सत्याजवळ होता. आयुकर्म संपवून त्याला सिद्धालयात जायचं होतं. त्यानं अमावस्येचा मुहूर्त साधला अन् अखेर तो तेजोमय ज्ञानसूर्य मावळला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्याचा शिष्य इंद्रभूती गौतम जो त्याची वाणी सर्वसामान्य जनतेस उलघडून सांगायचा त्यानं त्याचं दिवशी केवलज्ञान प्राप्त केलं. त्या काळोखात सूर्य सोडून गेला होता पण लगेचच एक दिवा प्रज्वलित झाला होता. आता ज्ञानाचा अंधार पडण्याची भीती राहिली नव्हती. म्हणूनच त्यावेेळीपासून ज्ञानाचा उत्सव दिव्यांनी साजरा करण्याची प्रथा पडली.
त्याच्या आयुष्यातील गर्भ, जन्म, दीक्षा, ज्ञान व निर्वाण या टप्यांना जैन संस्कृतीत कल्याणक असे संबोधतात. एकवेळ जन्म वगैरे कल्याणकारी असू शकतो पण निर्वाण (व्यवहार अर्थ: मृत्यू) हा कल्याणकारी कसा काय? डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात "अनेकांतवादाच्या दृष्टीनं पाहिलं तर मृत्यू हा फक्त देहाचा अंत असतो. त्याच्याकडे विघातक म्हणून न पाहता, विनाशक न मानता त्याला कल्याणक मानणं म्हणजे मृत्यूलाही अवीट सौंदर्य देणं आहे." आणि सर्वात महत्वाचं शरीराचा अंत हा ज्ञानाचा अंत नव्हताच मुळी! ते ज्ञान आजही जिवंत आहे. आणि तो तरी कुठं गेलाय? तो अजूनही जिवंत आहे आपल्यासारख्यांच्या हृदयामध्ये!
एक आर्त हाक द्या! त्याचं अस्तित्व नक्की जाणवेल.

*टीप:* सदर लेखात श्रीमदजिनेंद्र अंतिम तीर्थदेशना नायक भगवान महावीर यांचा एकेरी उल्लेख झाला आहे. हा उल्लेख आपुलकी व परमभक्तीपूर्वक केला आहे.
तसेच सहजपणा आणण्यासाठी काही ठिकाणी शास्त्रोक्त शब्द न वापरता व्यावहारिक शब्द वापरले आहेत.
©सुरज मडके

ती चांगलीच आहे


माहित नाही कशी आहे ती, अंदाज नाही मला तिचा
तरीही ती चांगलीच आहे.
फेसबुक व्हाट्सअप ला तासन्तास ऑनलाइन दिसते
तरीही ती चांगलीच आहे.
पोस्ट, कंमेंट, लाईक कधीच नसते; ऍक्टिव्हमात्र असते
तरीही ती चांगलीच आहे.
तिचं काही आहे-नाही, होतं-नव्हतं काही माहित नाही
तरीही ती चांगलीच आहे.
एका नजरेत आवडली, तिचा समजूतदारपणा भावला
पण ती समजूतदार असेलही- नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
पहिल्यांदाच हृदय दिलंय, तिला हृदय नसेलही
तरीही ती चांगलीच आहे.
भीती वाटते नकाराची, तिनं नाही म्हटलं तर?
तरीही ती चांगलीच आहे.
कधीकधी वाटतं धाडस करावं, एकदाचं विचारावं
पण! पण ती "हो" म्हणाली तर?
कारण ती चांगलीच आहे.
©सुरज मडके

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...